top of page

कोरीगड - कोराईगड

सध्या पावसाळा अगदी जोरावर आहे. पावसाची वाट जसा शेतकरी आतुरतेने बघत असतो तसेच अनेक भटके ज्यांना पावसाळ्यात गडकिल्ल्यावर भटकायला आवडत त्यांच्यासाठी पाऊस खास असतो. मी त्यातलाच एक भटका. माझ्या सारख्या अनेकांकडून पहिला पाऊस पडल्यावर गडकिल्ले फिरण्याच्या मोहिमा आखल्या जातात.


यंदा मोहीम आखली ती कोरीगडाची. कोरीगडाला कोराईगड असेही म्हणतात. मावळ मध्ये येणारे तिकोना,विसापूर, लोहगड, राजमाची आणि तुंग हे पाहून झाल्याने यंदा कोरीगडला जायचे ठरले. मावळ प्रातांत पडणारा हा किल्ला लोणावळाच्या जवळ असून Amby Valley हे कोरीगडाच्या पायथ्याशी आहे. किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच असून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.


साधारणतः कोरीगड हे पुणेपासून ७० किमी आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही भूर भूर पावसात पुणेहून सकाळी ६ वाजता निघालो. पावसाळ्यात पुणे लोणावळा रस्ता प्रेक्षणीय असतो. मजल दरमजल करत ८ वाजता आम्ही लोणावळाच्या lion's point वर पोहचलो. अर्थात आज शनिवार असल्याने पर्यटकांची गर्दी भरपूर होती. Lion's point ला न थांबता आम्ही कोरीगडावर निघालो. ५ किमी पुढे गेल्यावर तर डावीकडे तुंग गडाचा फाटा निघतो. तिथून तुंग किल्ल्याला जाण्याचा रस्ता आहे. तिथून सरळ अजून २-३ किमी प्रवास करून आम्ही पेठ शहापूर या गावात पोहचलो. इथेच पार्किंगची सोय असून ट्रेक सुरु होतो. जे ट्रेकर्स बस किंवा ट्रेन ने लोणावळपर्यंत येतात त्यांना लोणावळा ते Amby Valley बस किंवा रिक्षा पकडून इथे येणे शक्य आहे.


गडाच्या पायथ्यवरून वरती उभा डोंगर दिसत होता. इकडे अपेक्षेप्रमाणे प्रचंड पाऊस असल्याने हिरवाई सगळीकडे दिसत होती. डोंगराला जाणारी पायवाट शोधत आम्ही चढाई सुरु केली. वाटेत एक दोन ठिकाणी गावातील लोकांनी चहा, पाणी आणि खाण्याचे दुकान थाटलेले दिसले अशाच एका ठिकाणी आम्ही चहा घेतला. पावसात डोगंरावर बसून चहा पिणे यामध्येही एक वेगळं सुख आहे मग चहा कसाही असो त्याचा आनंद पूर्ण येतो. चहा आटपून नव्या दमाने चढाई सुरु केली. साधारण १ किमी ओबढ धोबड रस्ता ओलांडून गडाची खरी चढाई सुरु झाली. रस्त्यावर चिखल असल्याने चालण्याचा वेग कमीच होता.


गडाच्या मुख्य रस्त्यापासून पायऱ्या सुरु झाल्या. तिथेच शेजारी गडाची माहिती देणारा एक फलकही होता. फलक वाचून एक गोष्ट जाणवली तेथे गड कोणी बांधला याची माहिती न्हवती. कदाचित गड कोणी बांधला याचा इतिहास नसेल किंवा अनेक मतमतांतर असतील त्यामुळे स्पष्ट माहिती दिली नसेल.

यापढे चढायला पायऱ्या असल्याने भर भर किल्ला सर झाला. मुंबई आणि पुण्याच्या मधोमध हा किल्ला असल्याने दोघं शहरातून आलेले पर्यटक दिसत होते. मुंबई वरून अनेक ट्रेकर्स समूह पर्यटकांना घेऊन इथे येतात. त्यामुळे गर्दी जाणवत होती. मुख्य प्रवेशद्वाराच्या जसा गडांचा असतो तसाच बलाढ्य होता. मुख्य प्रवेश ओलांडून पुढे भली मोठी तटबंदी दिसत होती. प्रवेशद्वारावरची तटबंदी अजून शाबूत होती. त्यावर चढून खाली पाहिलं तर खाली फक्त घनदाड जंगल आणि Amby Valley चे काही घर दिसत होते. क्षणात जोराचा वारा आला आणि धुक्यखाली सर्व झाकोळल गेल. हा धुक्याबरोबरचा लपंडाव शेवटपर्यंत असाच सुरु होता.

तटबंदी वरून उतरून आम्ही आता गड फिरायला सुरवात केली. समोर एक सपाट पठार दिसत होत आणि गड किती मोठा आहे याचा अंदाज येत न्हवता. विसापूर किल्लाही असाच वरती एक मोठं सपाट मैदान आहे. किल्ल्यावर वरती काही ठिकाणी जरी तटबंदी किंवा भिंती शिल्लक आहे तरी काही ठिकाणी त्यांचे अवशेषच दिसतात. त्यामुळे गडाच्या काठापासून थोडं लांबच आम्ही फिरू लागलो कारण हवा प्रचंड वेगाने वाहत होती जर तोल वैगरे गेला तर माणूस थेट Amby Valley मधेच भेटेल. ठिकाण ठिकाणी पाण्याने काठोकाठ भरलेले तलाव दिसत होते. धुक्यातून रस्ता शोधत आम्ही डोंगराच्या एका टोकाला पोहचलो जिथे भगवा झेंडा फडकत होता. पावसातही अनेक पर्यटक फोटो काढण्यात मग्न होते. तिथून Amby Valley पूर्ण दिसत होतं अगदी त्यांची खासगी विमानासाठी असलेली Air Strip पण. आम्हीही तिथे फोटोसेशन करून पुढे उजवीकडे वळून गडाला एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी निघालो. पुढे आम्हाला कोराई मातेचे पुरातन मंदिर लागले. आम्ही दर्शन घेयचे म्हणून आतमध्ये शिरलो. मंदिर जरी पुरातन असलं तरी आतून मंदिराची बरीच डागडुगी केल्याने मंदिर भक्कम होत. थेट मंदिराच्या गाभ्यात प्रवेश करून कोराई मातेचेदर्शन घेतले. बाहेर पाऊस प्रचंड कोसळत असल्याने काही वेळ आम्ही मंदिरातच विश्रांती केली. यातून मला तिकोना किल्ला आठवला जिथे मी एकदा अशाच एका पावसात मंदिरात खूप वेळ बसून राहिलो होतो. थोडा पाऊस कमी झाला आणि आम्ही पुढे निघालो तिथे अजून एक छोटे मंदिर होते आणि मंदिराच्या आवारात दोन लहान छोट्या तोफा ठेवल्या होत्या. तोफेमधे जाणार गोळाही समोरच ठेवला होता. लहान मोठे सर्व तोफे कडे कुतूहलाने बघत आणि फोटो काढून घेत. एक वडील त्यांच्या लहान मुलाला किल्ला आणि तोफ यांच महत्व सांगत होते. आज जरी तोफा वैगरे शोभेच्या गोष्टी असल्या तरी जुन्या काळात युद्धासाठी मुख्य साधन होत. आजकाळ Technology आणि युद्ध कला खूप प्रगत झाली असली तरी त्याकाळी तोफही एक नवीन Techonology च होती. हे पाहून वाटलं, मी Time-Machine मध्ये बसून ४०० वर्ष पुढे जाव आणि पहाव वर्तमानात असलेल्या कोणत्या Technology आपल्यासाठी आता disturpting आहे त्या तेव्हा शोभेच्या गोष्टी मांडल्या आहे.


फोटो वैगरे काढून आता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. पाऊस कमी झाल्याने भर भर आम्ही खाली उतरत होतो. अनेक ट्रेकर्स वरती चढत होते किंबहुना मी २-३ वेगळे ट्रेकर्स समूह पहिले जे खास मुंबईवरून इथे आले होते. अर्ध्यतासात आम्ही सर्व पायथाशी पोहचलो. खाली उतरून परत एक चहा घेतला आणि वरती दिसत असलेला कोरीगड नजरेत साठवून परत निघालो.

 

सहकुटुंब किंवा Beginners साठी येण्यासाठी कोरीगड उत्तम पर्याय आहे. तुम्हाला इथेच जवळच तुंग, गघनगड हे किल्लेही भेटतील. फक्त इथे येतांना एक नियम नक्की पाळा तो म्हणजे गडाचे पावित्र्य जपा. कारण गड किल्ले हे फक्त पर्यटक स्थळे नसून एक आलोवकीक इतिहास आहे जो आपल्याला जपायचे आहे.



31 views0 comments

Comments


Post: Blog2_Post
bottom of page